Monday, July 26, 2010

सोनोरी किल्ल्यावर "एक दिवस निसर्गासाठी"

सोनोरी किल्ल्याच्या परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली आहे. इथला निसर्ग बहरावा म्हणून रविवारी गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी दि. २५ जुलै २०१० रोजी "एक दिवस निसर्गासाठी" हा उपक्रम किल्ले सोनोरी (मल्हारगड़) येथे आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत "निसर्गाला मानुन गुरु चला वृक्षारोपण करु" हा ध्यास मनी ठेऊन वैदिक मंत्रोच्चारासह वृक्षारोपण करण्यात आले.

यामध्ये गृहिणी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षिका, शेती, नोकरी-व्यवसाय करणारे तरुण-तरूणी आणि अनेक आयटी इंजिनीयर सहभागी झालेले किल्ले व निसर्गप्रेमी - स्नेहा कुलकर्णी, अरूंधती मरकळे, रुपाली जोशी, मनिषा वाघेला, हेमा लेले, संदीप सोनवणे, भारत मांडे, आकाश माने, कल्पेश मारलेचा, अमित चौलवार, गणेश बांगर, विवेक इगवे, लक्ष्मीकांत गोपुलवाड, गणेश जाधवर, अंकुश राठोड, महेश खराडे, रोहित मोहिते, अनिकेत पाटणकर, रविराज फुगे, ऋषिकेश मचाले, आणि छोट्या सहा वर्षाच्या सिद्धेश रोकले पासुन ते ९७ वर्षांच्या लक्ष्मण गणेश दिनकर यांनीही अतिशय उत्साहाने सहभाग घेतला.

यात उंबर, पिंपळ, वड, कडुलिंब, पळस, बेल, जांभुळ, आवळा, करंज, बहावा, सिताफळ, चिंच, कांचन, बांबू, परसपिंपळ(भेंडी), लिंबू, शिसू, पेरु, आंबा असा १९ प्रकारच्या एकुण १२७ देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले.

देशी वृक्षाचे निसर्गात तसेच धार्मिक व औषधी महत्त्व, रोपण करण्यात येणार्‍या प्रत्यके झाडांचे वैशिष्ट्य, पक्षी व वृक्षांचा असलेला परस्परावलंबी संबध याबाबत निसर्ग अभ्यासक उमेश वाघेला यांनी माहिती दिली. या किल्ल्यावर तुर्रेबाज गरुड(Crested Serpant Eagle), कापशी घार(Black Shouldered Kite), ससाणा(kestrel), व इतर शिकारी पक्षी दिसतातच तसेच पायथ्या पासून ते वर पर्यंत अनेक प्रकारचे पक्षी दिसतात. यात तितर(Rock Bush Quail), युवराज(Crested Bunting), तितर, सुभग(Common Iora), चंडोल(Lark), वेडा राघू(Green Bee Eater), लाजरी कोंबडी(White Breated Water Hen), सुगरण(weaver Bird), चन्ना पोपट इतरचा समावेश आहे.

सोनोरी (मल्हारगड) किल्ला स्वराज्यात बांधण्यात आलेला अंतिम किल्ला, म्हणून याला धाकटा किल्ला असे पण म्हणतात. पेशव्यांचे तोफखान्याचे सरदार भिवराव पानसे यांनी हा किल्ला १७९९ साली बांधला, अशी माहिती गिर्यारोहक निलेश गावडे यांनी दिली. किल्यावर त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक व दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या 'सोनोरी स्वच्छ्ता मोहिम' बद्दल माहिती दिली.

निसर्ग अभ्यासक चैतन्य राजर्षी यांनी वृक्षारोपण कसे करावे, व झाल्यावर कोणताही अविघटनशील असा प्लॅस्टिक कचरा मागे सोडू नये, किल्ल्याच्या परिसरात किल्ल्याच्या बांधकामाला धोका पोचणार नाही असा सुरक्षित अंतरावर वृक्षारोपण करावे याबद्दल मार्गदर्शन केले व आभार मानले. याच बरोबर सासवड येथील संगमेश्वर मंदीरची अद्भुत वास्तुकला व शिल्पकारी, मंदिराचे वेग वेगळ्या भागांबद्दल उमेश वाघेला यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाचे आणखी फोटो पहाण्यासाठी या लिंक वर क्लिक करा

http://picasaweb.google.com/swastishreehobbies/EkDiwasNisargasathiMalhargad#

Wednesday, July 7, 2010

"एक दिवस निसर्गासाठी" किल्ले पुरंदरला


स्वस्तिश्री हॉबीज द्वारा रविवार दि. ४ जुलाई रोजी किल्ले पुंरदर येथे 'एक दिवस निसर्गासाठी' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमांतर्गत देशी व स्थानिक झाडांचे पुरंदर किल्यावर वृक्षारोपण करण्यात आले. ज्येष्ठ इतिहास संशोधक व दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांनी किल्ले पुरंदरचा इतिहास व किल्यांचे प्रकार या विषयावर व्याख्यानाद्वारे विस्तृत माहिती दिली.

या "एक दिवस निसर्गासाठी" कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपणाची सुरुवात प्रमोद मांडे यांच्या हस्ते 'करंज' वृक्षाचे रोप लावून करण्यात आली.










रोपण करताना निसर्ग अभ्यासक चैतन्य राजर्षी यांनी वैदिक मंत्र म्हटला तो असा:

नमो वृक्षेभ्यः |

यथेयं पृथिवी देव भूतान गर्भे दधाति वै |

तथेमं वृक्षक दध्यात् त्वा तस्यावसे हृये ||

याचा अर्थः वृक्षास नमस्कार असो. पृथ्वीवरील सर्व सजीवांप्रमाणे वृक्षसुद्धा पृथ्वीचीच संतति आहे. तेव्हा तुझा वंशविस्तार पुन्हा पृथ्वीवर स्थापन करत आहे. हे परमेश्वरा, ह्या रोपट्याचे रक्षण करण्यासाठी तू सहाय्य कर.

कार्यक्रमामध्ये महिला, महाविद्यालयीन तरूण-तरुणी, नोकरी-व्यवसाय करणारे तरूण-तरुणी, गृहिणी, शिक्षिका, यांच्यासह एक सहा वर्षाच्या छोट्या स्वराज यानेही भाग घेतला. सगळ्यांनी अतिशय उत्साहात आवर्जुन स्वतःच खड्डे खणुन वेदिक मंत्रोचारसह वृक्षांचे रोपण केले. देशी वृक्षात पळस, उंबर, आवळा, रिठा, बहावा, शिरीष, बुच, काटेसावर, वड, कडुलिंब, बेल, कवठ, करंज, आंबा, कैलासपती अश्या १५ प्रकारच्या एकुण ८५ झाडांचे रोपण करण्यात आले. त्याबरोबर आंबाच्या कोयी व जांभुळ, सिताफळाच्या बियांचेही रोपण करण्यात आले.

सहभागी झालेले किल्ले व निसर्गपप्रेमी - हेमा लेले, स्नेहा कुलकर्णी, रुपाली जोशी, मनिषा नायडु, प्रियांका महाडिक, मनिषा वाघेला, अतुल सोनवणे, संदिपान नलावडे, अभय पवार, केतन गुंडा, सचिन पांडे, निशा राजर्षी, नितेश व शरयू निंबाळकर, रविराज फुगे, ऋषिकेश मचाले,सहा वर्षाचा छोटा स्वराज गावडे सहभागी झाला. वृक्षारोपण झाल्यावर इथे कोणताही प्लास्टिक कचरा न ठेवता सगळा जमा करून आणला.


या कार्यक्रमांतर्गत गिर्यारोहक निलेश गावडे यांनी किल्ले पुरंदर सर्वांना दाखवला. किल्यावर त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या २० टप्पाच्या 'पुरंदर स्वच्छ्ता मोहिम' पैकी १२ टप्पे पुर्ण झाल्याची माहिती दिली. या स्वच्छ्ता मोहिमे दरम्यान बुरुजात सापडलेल्या पायर्‍या विषयी त्यांनी सांगितले. अशी रचना जगात दुसरे कोणत्याही किल्यावर नाही. या पायर्‍यांचा उपयोग खालच्या बुरुजावर असलेल्या तोफेत दारुगोळा भरुन वर जाउन वात लावण्यासाठी करण्यात यायचा, तसेच कुणालाच माहित नसलेला काळा बुरूज ही स्वच्छता मोहिमे दरम्यान सापडला असे सांगितले।

पुरंदर किल्ल्यावर फुलणार्‍या एकुण ६०० प्रकारच्या वनस्पति आहेत. या पैकी 'किक्सकिया केब्युलिका' व 'इरेथिना' या वनस्पती किल्ल्यावरच्या सर्वात उंच ठिकाण असलेल्या केदारेश्वर मंदिराच्या बांधीव पायर्‍यांच्या चिर्‍यांमध्येच येते, जगात दुसरे कोठेही येत नाही. तर काही दुर्मिळ वनस्पती पुरंदर किल्ल्यावर आणि हिमालयात येतात तर काही अन्नामलाईच्या जंगलात, काही अफगानिस्तानला ! पुरंदरची उंची समुद्र सपाटीपासुन १५०० मीटर असून इथल्या वनस्पती अल्पाईन प्रकारच्या आहेत, ज्या हिमालयात सापडतात. पिवळा तेरडा, श्वेतांबरा, फ्रेरिया, आकाशतुळस, चिरेहबे आमरी व अनेक अशी दुर्मिळ रानफुले इथे पावसाळ्या दरम्यान पहायला मिळतात. केदारेश्वरला जाताना मध्येच येणार्‍या टाक्यावर हिवाळ्यात प्रवासी वटवाघळांचा थवा येतो. तिन्ही सांजेच्या वेळी व प्रभात काली ह्या थव्यावर बोनेलीस गरुड (Bonelli's Eagle) व शाहिन फाल्कन (Falcon) ताव मारताना दिसतात. पुरंदर हे उंच ठिकाण असुन शिकारी पक्षी इथे सहज दिसतात. कापशी घार(Blck Shoulderd Kite), व इतर शिकारी पक्षींसह शिपाई बुलबुल, सुभग, तितर, असेही अनेक पक्षी इथे दिसतात. असी माहिती निसर्ग अभ्यासक उमेश वाघेला यांनी दिली.

कार्यक्रमाचा समारोप या श्लोकाद्वारे करण्यात आला:

त्रायन्तां चेमं देवा: त्रायन्ता मरुतां गणा: |

त्रायन्तां विश्वभूतानि यन्नायमस्या वसत् ||

याचा अर्थः देवा. ह्या वृक्षांचे रक्षण कर, मरुदगण यांचे रक्षण करोत, पंचमहाभूते यांचे रक्षण करोत, ज्यायोगे हे वृक्ष निरोगी आणि पुष्ट होवोत.स्वराज ने केदारेश्वर मंदिराच्या इथे पोवाडा म्हणून दाखवला.या निसर्ग संवर्धन मोहिमेत जास्तीत जास्त लोकांचा सहभाग व्हावा म्हणून स्वस्तिश्री हॉबीज तर्फे "एक दिवस निसर्गासाठी" संपूर्ण पावसाळ्यादरम्यान दर वर्षी राबविण्यात येणार आहे.








या कार्यक्रमाचे आणखी फोटो पाहण्यासाठी

http://picasaweb.google.com/swastishreehobbies/OneDayForNature#